सुरळीत वीजपुरवठ्याला वीज यंत्रणा जवळील आगीचे ग्रहण
आतापर्यंत ६ ठिकाणी आगी; ६ लाखांवर ग्राहकांना फटका
PUNE NEWS पुणे : एकीकडे तापत्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत असल्याने वीज वितरण यंत्रणेवर ताण आला आहे. त्यात शहरी व ग्रामीण भागात असलेल्या महापारेषण व महावितरणच्या वीजयंत्रणेजवळ किंवा वीजतारांखाली उस, गवत व कचरा पेटवण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या महिन्याभरात आगीमुळे पारेषण व वितरण यंत्रणेत (Transmission, distribution) सहा ठिकाणी बिघाड झाल्यामुळे तब्बल ६ लाख २३ हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला तर महावितरणला देखील वीज विक्रीमध्ये नुकसान सहन करावे लागले आहे. (Smooth power supply disrupted due to fire near power system)
केंद्र सरकारने अखेर स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळला ; सर्व प्रकल्प महापालिकांकडे होणार वर्ग
दरम्यान शहरी व ग्रामीण भागातील विजेचे उपकेंद्र, शेती तसेच सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा वीजतारांखाली उस, गवत किंवा कचऱ्याच्या ढिगारा पेटवल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ किंवा वीजतारांखाली कचरा किंवा गवत टाकू नये किंवा त्याचा ढिगारा जाळू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी महापारेषण व महावितरणच्या वीजवाहिन्या शेतातून, जंगलातून गेलेल्या आहेत. प्रामुख्याने महापारेषणच्या टॉवर लाइन्सखाली (वीजतारांच्या वाहिन्या) गेल्या २३ फेब्रुवारी ते २८ मार्चपर्यंत गवत, उस व जंगलातील वणवासदृश्य आगीचे तब्बल पाच प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने चाकण, भोसरी व हिंजवडी फेज १ ते ३ मधील सर्व लहानमोठे उद्योग तसेच पिंपरी चिंचवड शहर, वाकड, भोसरी गाव आदींसह मुळशी तालुक्यातील अनेक गावांतील सुमारे ५ लाख ९६ घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांना दोन ते तीन वेळा प्रत्येकी ४५ ते ६० मिनिटे खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागले आहे. तर पुणे शहरातील नवले ब्रीज ओढ्याजवळ टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने महावितरणच्या अमित उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी जळाली. परिणामी २७ हजार वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. या आगीच्या सर्व प्रकारांत महावितरणचे देखील वीज विक्रीमध्ये नुकसान झाले.
महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कंपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खाद्य पदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. प्राण्याचा नाहक जीव जाण्याचेही प्रकार घडले आहेत.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजवाहिन्यांच्या खाली तसेच रोहित्र, फिडर पिलर व इतर वीजयंत्रणेजवळ ओला व सुका कचरा टाकू नये. साठवलेला कचरा जाळू नये. कचरा, वाढलेले तण, गवत, उसाच्या आगीमुळे प्रामुख्याने वीजवाहिन्यांमध्ये ट्रिपिंग आल्याने वीज पुरवठा खंडित होतो. वीजयंत्रणेला जवळच्या आगीमुळे धोका असल्याचे लक्षात येताच २४ तास सुरु असलेल्या महावितरणच्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.