मुंबई : (Maharashtra Budget 2021) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना अर्थसंकल्पात जाहीर झाल्या आहेत. यात महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्क्यांची कपात करणारी “राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना” घोषित झाली आहे. (Rajmata Jijau Grihaswamini Yojana)
यामुळे महिला खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी होण्यास मदत होईल, असा विश्वास वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेतून ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना मोफत बसची सुविधा उपलब्ध करून दिल्याने मुलींची शैक्षणिक गळती थांबण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी नव्याने सुरु करण्यात आलेली संत जनाबाई सामाजिक सुरक्षितता योजना, तेजस्विनी बस संख्येत वाढ, राज्य राखीव महिला पोलिसांची स्वतंत्र तुकडी यासारखे महत्त्वाचे निर्णयही आजच्या अर्थसंकल्पातून घेण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
पर्यटनातून विकास
राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या आणि रोजगार संधी निर्माण करणाऱ्या उद्योग, व्यवसाय, पर्यटन यासारख्या क्षेत्रांना आपण सवलती आणि सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्लग अँड प्ले सारख्या नावीन्यपूर्ण कल्पना आपण राज्यात राबवित आहोत. पर्यटनातून रोजगार संधी विकसित करण्यासाठी या क्षेत्राला आदरातिथ्यचा दर्जा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय या शासनाने घेतला असल्याचे ते म्हणाले. शासनाने कृषी पर्यटन धोरण, कॅराव्हॅन, बीच शेक्स, लोणार सरोवराचा विकास, गड किल्ल्यांचे संवर्धन, वन विकास यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक वाढतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यानी बोलून दाखवला.

करोना काळात १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक आणि ३ लाख रोजगार निर्मितीमुळे राज्यातील उद्योगाला मोठी चालना मिळेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पायाभूत सुविधांचे मेट्रो जाळे राज्यातील शहरांमध्ये बळकट करण्यात येत आहे. मेट्रो कोच, वरळी शिवडी उन्नत मार्ग असो की एमटीएचएल प्रकल्प, आपण सर्वच कामांना गती दिली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा आपण मेपासून सुरु करत आहोत, या महामार्गाला मराठवाड्यातून जोड रस्ते देखील बांधण्यात येत आहेत. रेवस-रेडी मार्ग, पुणे व नागपूर मेट्रोची कामे वेगात होत आहेत. या सर्व प्रयत्नातून राज्य अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पुण्याबाहेरून जाणारा चक्राकार मार्ग असेल, रस्ते, विमानतळ, जलमार्ग, जलद रेल्वे विकास, ग्रामीण आणि शहरी भागातील गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामासाठी दिलेला निधी असेल, या सर्वच बाबींसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदी आहेत. मुंबई विकासाच्या अनेक प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छ शासकीय कार्यालये, शिवराज्य सुंदर ग्राम सारख्या नवीन योजनाही अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. उसतोड मजुरांसाठी कल्याणकारी योजनेमुळे या मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. आदिवासी आश्रमशाळाना मॉडेल शाळांमध्ये रुपांतर केले जाणार आहे. कातकरी, गोंड आदिवासी समाजासाठी एकात्मिक वसाहती या देखील त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपयोगी ठरेल. डोंगरी विकास, धनगर वस्त्यांसाठी वाढीव निधी दिला आहे. तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी, प्राचीन मंदिरांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
महिला सक्षमीकरणावर भर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना अर्थसंकल्पात जाहीर झाल्या आहेत. यात महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्क्यांची कपात करणारी “राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना” घोषित झाली आहे. यामुळे महिला खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी होण्यास मदत होईल, असा विश्वास वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेतून ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना मोफत बसची सुविधा उपलब्ध करून दिल्याने मुलींची शैक्षणिक गळती थांबण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी नव्याने सुरु करण्यात आलेली संत जनाबाई सामाजिक सुरक्षितता योजना, तेजस्विनी बस संख्येत वाढ, राज्य राखीव महिला पोलिसांची स्वतंत्र तुकडी यासारखे महत्त्वाचे निर्णयही आजच्या अर्थसंकल्पातून घेण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.