पुणे : पुण्यातील ट्रॅफिकला कंटाळून हिंजवडी आयटी पार्कमधून ३७ कंपन्या पुण्याबाहेर आणि राज्याबाहेर जाणे हे धक्कादायक आहे. यामुळे पुण्यातील रोजगाराबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिकेने तत्परतेने या भागातील वाहतूक कोंडीवर युद्धपातळीवर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी केली. राज्य सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष घालून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही ते म्हणाले. (37 companies moving out of Hinjewadi IT Park is shocking MLA Ravindra Dhangekar)
हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल ३७ कंपन्या पुण्याबाहेर हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई (Hyderabad, Bangalore, Chennai) येथे गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर बोलत होते. गेल्या दहा वर्षात पुणे शहराच्या पायाभूत सुविधांवर नीट नियोजन करून कामे केले नसल्यामुळे सगळे परिणाम आज आपल्याला भोगायला लागत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
Related Posts
रवींद्र धंगेकर म्हणाले, हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi IT Park) अनेक नामवंत कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत आहेत त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होणार नाही, याकडे पोलिसांनी आणि महापालिकेने सुरुवातीपासूनच गांभीर्याने पाहणे आवश्यक होते. ते झाले नाही म्हणून आज अनेक कंपन्या पुण्याबाहेर आणि राज्याबाहेर गेल्या आहेत. आणखी काही कंपन्या पुण्याबाहेर स्थलांतरित होण्याचा विचार करीत आहेत. पण, राज्याच्या उद्योग मंत्र्यांना याची काहीही माहिती नाही, हे सरकारचे दुर्दैव आहे.
कुठल्याही सर्वसामान्य माणसाला सकाळी घरून ऑफिसला जायला दोन – दोन तास लागत आहेत. तर ऑफिस मधून घरी येताना सुद्धा तेवढाच कालावधी लागत आहे. त्यामुळे कामाचा निम्मा वेळ प्रवसात जात आहे. पुणेकरांची जीवनशैली सुसह्य करण्यासाठी पालिकेने, वाहतूक पोलिसांनी कार्यरत रहायला हवे. पुढच्या ४०-५० वर्षाचे नियोजन करून काम करायला हवे. याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच अनेक प्रश्न उद्भव ले आहेत, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.